Sunday, February 5, 2012

ती...एक पणती!

'ती' एक पणती
अवघ्या अंधार रात्री
नक्षत्रांच्या करणारी
दिवसातले सारे सारे क्षण
उजळून टाकणारी
भवताली दाटून येणारा
गहन अंधार
आपल्यातच बंदिस्त करून
आपल्यातील मोहक क्षणांनी
इतरांना फुलवणारी...













'ती' आहे स्निग्ध प्रकाशमय
आपल्यातील
आनंद लहरींनी मनं मनं चेतवणारी
आपल्यातील तेजाचे लखलखीत दीप
आपल्या भवताली वर्षानुवर्षे उजळून
दीपोत्सव साजरा करणारी
माझ्यात स्वतःसह
खोलवर गुंतलेली, रुतलेली... तरीही
तरीही... मला गहन, गूढ वाटणारी
माझी आवडती 'ती'
माझीच
केवळ माझीच
'ती' एक पणती..!

Saturday, July 10, 2010

सखी-सोबती..

उन्हाळ्याच्या सुट्या संपता संपत नव्हत्या. मी फारच कंटाळलो होतो. न जाणे शाळा पुन्हा कधी चालु होईल?! इयत्ता ९वी-अ..नवी पुस्तके, नव्या वह्या आणि नवा गणवेश. नुसत्या विचारानेच मन आनंदून गेलं. पण त्याला अजुन बराच अवकाश होता. माझं मन पुन्हा खट्टू झालं. तस पहिलं तर पप्पा म्हणत होते कि आजी-आजोबांकडे जाऊन ये काही दिवस..पण मलाच जायचे नव्हते. मुळात मला आमच्या आजोळी जाणं इतकं आवडत नसे..आणि हे पप्पांना  ही ठाऊक होतं. पण मी त्यांच्या समोर असं प्रत्यक्ष बोलणं टाळत असे. तसा आमचा गाव फारच सुंदर व रमणीय आहे. थंड हवामान, शांतता आणि गावाबाहेरून वाहणारी नदी.. मज्जा यायची. पप्पा आणि मी तासन-तास नदीत डुंबत असू. एकदा विचार आला ही कि जावूया आजी-आजोबांना भेटायला. पण मीच स्वत:ला आवरले.    

कारण आजीला संधिवाताचा त्रास  होता..तेही २० वर्षांपासून. सुरुवातीची काही वर्षे आजी चालु-फिरू शकत असे. पण नंतर तिचा त्रास वाढला आणि कुबड्याही साथ देईनाश्या झाल्या. तिचे चालणे-फिरणे बंद झाले ते कायमचेच. आजीचे सगळे प्रात:विधी मग बिछान्यावरच असायचे. त्यात घरी त्यांची काळजी घेणारं आजोबांशिवाय कुणीच नव्हत. सगळी मुले, म्हणजे माझे पप्पा आणि काका हे नोकरीनुसार बाहेरगावी स्थायिक झाले होते. त्यामुळे आजीची सर्व जबाबदारी पडली ती माझ्या आजोबांच्या खांद्यावर.. तसे आजोबा ही वार्धक्यामुळे वरचे वर आजारीच असत. पण आजीच्या देखभालीत त्यांनी तसूभरही कमी ठेवली नाही. आजीची स्वच्छता, दोघांची औषधी, स्वयंपाक आणि घराबाहेरची कामे..सर्व अगदी व्यवस्थित पार पडे. आजोबांना यामुळे खूप थकवा जाणवे आणि हे आजीला दिसत होत, जाणवत होत. याचमुळे कि काय, आधी हसरी व प्रेमळ असणारी माझी आजी चिड-चिडी  झाली होती. छोट्या-छोट्या शुल्लक कारणावरून ती आरडा-ओरड करत असे, आजोबांशी भांडत असे. मला आजीचा फार राग येई. याच कारणामुळे मी आजोळी जाण्यास सहसा उत्सुक नसे.

एरवी आमच्या घरी कुणाचे-ना-कुणाचे येणे-जाणे असायचे. पण या सुट्ट्यांमध्ये कोण येणार?! माझे घराजवळचे मित्र ही गावी गेले होते. म्हणून मला जास्तच एकाकी वाटत होत. इतक्यात दारावरची बेल वाजली. आज शेजारचे कुटुंब गावाहून परतणार होतं. "तेजस आला असेल बघ..", आई म्हणाली. मी धावतच जाऊन दार उघडले. पाहतो तर काय..पोस्टमन होता. त्याला पाहताच मला तर रागच आला. मी तसाच माघारी फिरलो आणि आईला सांगितलं,
"पोस्टमन आहे. तूच बघ."
"अरे हा काय उद्धटपणा चालवला आहेस तू? त्यांना घरात तर बोलव.." आई माझ्याकडे डोळे वटारून पाहत होती. पण मी कुठला थांबतोय तिथे हे ऐकायला?! मी पाय आपटतच खुर्चीत जावून बसलो. तार आली होती..आजोबांची. आजीची तब्येत फार गंभीर झाली होती. तिला हॉस्पिटल मध्ये दाखल केल होतं. आम्हाला तातडीने निघावं लागणार होतं..

चला, तेवढच आपल फिरणं  होईल, मनात विचार आला. आम्ही लागलीच गावी जायला निघालो. रेल्वेसाठी तालुक्याला जावं लागत असे. तिथे गेल्यावर कळलं कि गाडी दोन तास उशीराने धावत आहे. झालं! इथेही वाट पाहणेच नशिबी होतं माझ्या. मला स्वत:वरच राग येत होता. पण स्टेशन वर थांबण्याशिवाय पर्याय नव्हता.
"आजोबांना फोन करून येतो कि आपल्याला उशीर होईल." पप्पा म्हणाले. मी ही निघालो त्यांच्या बरोबर. त्या काळी आज सारखे मोबाईल नव्हते. STD करावा लागे. पप्पांनी हॉस्पिटल मध्ये फोन लावला. पलीकडून आजोबांचा आवाज आला, "तुझी आई देवाघरी गेली बाळ." आजी-आजोबा पप्पांना 'बाळ' म्हणत असत.

"आजी गेली..", पप्पा तार स्वरात बोलले. बर झालं, आजोबांचा त्रास तर कमी झाला..मला वाटल. आई-पप्पा सांगत होते कि फार भयंकर दुखणं असतं संधिवाताच. मला क्षणभर आजीसाठी फार वाईट वाटलं. आपण दोन दिवस जरी आजारी पडलो आणि पलंगावर पडून रहाव लागलं, तरी किती कंटाळा येतो आपल्याला?! आणि आजी मागच्या वीस वर्षांपासून त्या बिछान्यावरच होती. खाणं-पिणं, बसणं, झोपणं, प्रात:विधी..सगळ-सगळ  बिछान्यावर! किती त्रास होत असेल आजीला.. आणि त्यामुळे किती कष्ट पडत असतील आजोबांना?!! खरच, चांगलच झालं कि आजी गेली. आजी त्या जाचातून तर सुटली. आता आजोबांना ही आरामात राहता येईल. नाही म्हटल तरी आजोबांना आजीचा त्रास हा होताच. मी वरकरणी जरी दाखवत नसलो, तरी आतून मात्र मला आजोबांसाठी बरच वाटत होतं.

आम्ही गावी पोहोचेपर्यंत आजीला घरी आणण्यात आल होत. घरात शिरलो आणि मला एक अनपेक्षित दृश्य दिसलं. आजोबा आजीच्या पार्थिवाजवळ बसले होते..आणि धाय मोकलून रडत होते. मला वाटलच होत कि आजोबांना दु:ख होईल. पण इथे तर त्यांच  रडणं पराकोटीला गेलं होतं. माझे सगळे काका त्यांच्या जवळ बसले होते आणि त्यांचे सांत्वन करत होते. पण आजोबा काही शांत होत नव्हते. ते सारखे आजीला उठवण्याचा प्रयत्न करत होते..जणू काही ती फक्त गाढ झोपेत आहे. पप्पा त्यांना समजवण्याच्या सुरात म्हणाले, "अहो, का रडताय तुम्ही एवढे? उलट तिला त्रासातून सुटका मिळाली असा विचार करा.."

"अरे पण मी आता या घरात एकटा काय करू? कशी ही असली तरी माझी सोबतीण होती ती..माझ्या सुख-दु:खाची साथीदार होती. मागची चाळीस वर्षे ऐकतोय मी तिची कटकट..सहन करतोय तिची चिड-चिड..आता तर सवयच झाली आहे या सर्वांची. ती अशी कशी मला अर्ध्या वाटेत सोडून जाऊ शकते? अगं ऐकते आहेस का तू? उठ बर आता. बघ तुझे सगळे मुलं आले आहेत तुला पहायला..." आजीकडे पाहत बोलले आजोबा.

त्यांचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात सागरच उतरला. कदाचित लग्न म्हणजे काय हे समजण्या इतपत वय असेल वा नसेलही माझं, पण 'सोबत' आणि 'साथ' या शब्दांच वजन मात्र नक्कीच पेलवण्यासारखं नव्हतं मला...  

Friday, May 7, 2010

'आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे...'

'आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे'

पहिली-दुसरी च्या बालभारती तील ही कविता! आताशा संपूर्ण आठवतही नाही. पण लहानपणी मात्र ही कविता आम्ही सारे वर्गमित्र मिळून एकसुरात म्हणत असू. काय दिवस होते यार ते! सकाळी आई मस्त तयारी करून देणार, नाश्त्याचा डबा घेऊन मग आम्ही बाबांसोबत घरातून बाहेर पडणार, डुलत-डुलत आमची स्वारी वर्गात पोहोचणार; दिवसभर थोडा अभ्यास, थोडं शिकणं, थोड्या खोड्या आणि भरपुर धमाल!! घरी परतल्यावर लगेच मैदान गाठायच आणि मग लगोरी, सोन-साखळी, आबा-धुबी हे खेळ.. सायंकाळी थकून-भागून घरी आलो की अभ्यास, जेवण आणि मग झोप! हा कार्यक्रम शालांत परीक्षा होई पर्यंत निरंतर चालू होता. पण नंतर मात्र हे सगळ आपोआपच बंद झालं..

एक दीर्घ उसासा टाकत मी कॉफ़ी चा कप हातात घेतला आणि घराच्या गैलरीत आलो. फार विहंगम दृश्य दिसत होतं. दोन पतंग आभाळी उडत होते. जणू वाऱ्याशी स्पर्धा करत होते. नुकताच सूर्य पलीकडच्या डोंगराआड जाउन लपला होता. आकाशात विविध रंग विखुरलेले होते. पश्चिमेची थंड हवा मनाला प्रसन्न करत होती. फार दिवसांनंतर मी अशी प्रसन्नता अनुभवली. माझे केस वाऱ्यावर भिरभिरत होते. पुन्हा माझ मनं गत आयुष्यात रमून गेलं...

ना काही चिंता, ना कसला ताण! जीवनाचा आनंद मुक्त हातांनी लुटा आणि मौज करा, बस एवढंच ठाउक होतं तेव्हा.. आणि मग पैशांच्या मागे धावता-धावता कधी तारुण्य संपलं व कधी म्हातारपणाची चाहुल लागली कळलं सुद्धा नाही. जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यांनी जसं काही मला बांधून ठेवलं होतं. या गैलरीतुन दिसणाऱ्या देखाव्यासाठी मी हे घर विकत घेतलं, पण प्रत्यक्षात मी इथे हा देखावा पहायला किती वेळा आलो?? एकदाही नाही!!! आज या सगळ्या गोष्टी आठवायच कारण म्हणजे आज सदा चा वाढदिवस! सदाशिव माझा बालपणीचा जिवलग मित्र. आमच्या घराजवळच रहायचा. अगदी घट्ट मैत्री आमची! तसा तो अभ्यासात हुशारच होता पण त्याला प्रवासाचं, नव-नविन जागा पहाण्याचं भारी वेड! कुठे सहलीसाठी जायचं असेल तर विचारून तर पहा..एखाद्या ठिकाणाची इत्यंभूत माहिती असायची त्याच्याजवळ. पुढे मग त्याने शिक्षण सोडलं आणि एका यात्रा कंपनीत गाइड म्हणून कामाला लागला. खुप मेहनत केली, खस्ता खाल्या. आज त्याची स्वत:च्या मालकीची एक यात्रा कंपनी असून १३ गाड्या आहेत. अजूनही, म्हणजे या वयातही तो आवर्जुन एखाद्या सहलीला जातो. त्याच्या कर्मचारी-वर्गाला स्वत:चे अनुभव सांगतो. ग्राहकांना हवी ती माहिती पुरवतो. एकंदरीत त्याचं मस्त चाललं आहे...

क्षणभर मला त्याचा हेवा वाटला.. अरेच्चा! पण मी ही काही वाईट जीवन नाही जगलोय. चांगला प्रथम श्रेणीत इंजिनियर झालो, मोठ्या पगाराची नोकरी आहे, छानशी बायको मिळाली, या उच्चभ्रू ठिकाणी मी घर विकत घेतलं, चिक्कार पैसा कमावला, दोन मुले कर्तबगार झाली.. सर्व जबाबदाऱ्या मी व्यवस्थित पार पाडल्या. एक यशस्वी व्यक्तिला आणखी काय हवं? काहीच नाही.. पण मग मला त्याचा हेवा वाटण्याच कारण काय?


तेवढ्यात त्या पतंगांतली एक पतंग कटली आणि वाऱ्यासोबत आपल्याच लहरीत भिरभिरत निघाली. दूसरी अभिमानाने आकाशात उंचावर उडत होती परंतु ती स्वच्छंदी उडू शकत नव्हती. कारण तिच्या दोऱ्याचं एक टोक दुसऱ्याच्याच हातात होतं..!

Wednesday, April 28, 2010

जीवनाचा पाठ!

एकदा एक जहाज समुद्र किनाऱ्यावर येतं. त्यातून एक झकपकीत पोशाख असलेला इसम उतरतो. त्याची नजर त्या लहान पण सुंदर अशा गावावरून भिरभिरत एका मासेमाऱ्यावर जाउन स्थिरावते.
मासेमारी हातातला गळ पाण्यात टाकुन मासे पकडत असतो. विस्मयचकित होउन तो इसम मासेमाऱ्याजवळ जाऊन विचारतो,"अशा रितीने तू किती वेळ मासे पकडतोस?"
"जास्त नाही, थोडा वेळच" मासेमारी उत्तरला.
"अरे पण जाळ वापरून तू जर जास्त वेळ मासेमारी केलीस, तर तू भरपूर मासे पकडू शकतोस!"
"यावर माझं आणि माझ्या परिवाराच पोट भरत, जास्त मास्यांच मी काय करणार?" इति मासेमारी.
"पण मग तू इतर वेळ काय करतोस?"
"मी सकाळी गरजे पुरते मासे पकडतो. नंतर माझ्या मुलांसोबत खेळतो, बायको सोबत गुजगोष्टी करतो, फिरायला जातो, एखादं पुस्तक वाचतो, संध्याकाळी मी मित्रांना भेटतो, त्यांच्या सोबत गप्पा मारतो, गिटार वाजवतो, गाणी गातो आणि रात्रि लवकर झोपी जातो. अशा रितीने माझा दिवस संपतो।"
मधातच अडवत तो इसम म्हणाला,"हे बघ, मी मुंबई विद्यापिठातुन MBA केलेलं आहे. मी निश्चितच तुझी मदत करू शकतो. तू दिवसाचा जास्तीत जास्त वेळ मासेमारी कर. अतिरिक्त मासे विकून तू एक नवी मोठी होडी विकत घेऊ शकतोस!"
"त्या नंतर मग?" मासेमाऱ्याने विचारले.
"मोठी बोट असल्यामुळे तुझ्या कमाईत निश्चितच भरपूर वाढ होईल. मग कमाईचे पैसे वाचवून तू आणखीन एक होडी विकत घे. मग दूसरी, तीसरी.. अशा रितीने काही कालावधीतच तुझ्याकड़े होड्यांचा ताफा तयार होईल."
"बरं.. मग?"
"नंतर तू स्वयंचलित जहाजं सुद्धा घेऊ शकतोस ज्यामध्ये मोठं-मोठ्या यंत्रांद्वारे मासेमारी केली जाते. तुझे उत्पादन वाढल्यावर तू मासे मध्यस्थला न विकता स्वतःच व्यापार करू शकतोस. मग तू हे लहानस गाव सोडून मुंबईला जाऊ शकतोस आणि तिथेच तुझा मोठा व्यापार मार्गी लाऊ शकतोस!"
"असं का? याला एकंदरीत किती वेळ लागेल?" गळाला लागलेला मासा जवळच्या पिशवीत टाकत मासेमाऱ्याने विचारले.
"जवळपास वीस-पंचवीस वर्षे!"
"मग पुढे?"
"पुढे? या नंतरच तर खरी मज्जा आहे मित्रा! जर तू इतका मोठा व्यापारी बनलास तर लाखो-करोडो रुपये कमवू शकतोस!"
"लाखो? खरच?? आणि त्यानंतर?"
"अरे त्यानंतर मग कामातुन निवृत्त होऊन तू समुद्र किनारच्या एखाद्या लहानशा सुंदर गावात स्थायिक होऊ शकतोस, आरामात जीवन कंठु शकतोस, बायको-मुलां सोबत वेळ घालवू शकतोस आणि संध्येला मित्रांसोबत मजा करू शकतोस..!"
तो मासेमारी स्मित करत आणि हातातला गळ पुन्हा पाण्यात टाकत म्हणाला,"मग मी आता वेगळं काय करतोय?!"

Followers